औंध : येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात उद्योजकता विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांनी भूषविले. या वेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, ‘महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना नोकरीची संधी मिळाली नाही, तर त्याने स्वयंरोजगाराची प्रेरणा घेऊन छोट्या-मोठ्या उद्योगातून रोजगार निर्माण करावा या उद्देशाने महाविद्यालयामध्ये उद्योजकता विकास समिती कार्यरत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सातत्याने समुपदेशन आणि आवश्यक ते मार्गदर्शन होण्यासाठी महाविद्यालयात उद्योजकता विकास समिती स्थापन करण्यात येणार आहे.’
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यातील क्वालिटी इंडस्ट्री ग्रुपचे संचालक दिगंबर सुतार, अरविंद पित्रे, जी. के. चंदावरकर, शाम वाघ, एस. जी. आपटे, तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. हर्षकुमार घळके, प्रा. कुशल पाखले, प्रा. शशी कराळे यांसह इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना प्रमुख पाहुणे सुतार म्हणाले, ‘व्यवसायात यश संपादन करण्यासाठी काहीतरी ध्येय समोर ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी योजना आखून, ज्ञान ग्रहण करून, सातत्याने परिश्रमाची तयारी ठेऊन, सकारात्मक दृष्टिकोन बाळगून, सामाजिक भान ठेऊन उद्योग व्यावसाय सुरू केल्यास निश्चितपणे व्यावसायात यश मिळू शकते. स्पर्धेच्या युगात आपला व्यवसाय वाढवायचा आणि टिकवायचा असल्यास सातत्याने दर्जेदार उत्पादन देणे आवश्यक आहे.’
पित्रे म्हणाले, ‘उद्योग, व्यवसाय करण्याअगोदर आपण जीवनातील ध्येय निश्चित करायला हवे. वित्तीय नियोजन करावे. योग्य व्यवसायाची निवड, विक्रीचे नियोजन, व्यवसायाचा आराखडा आणि अष्टावधानी लक्ष ठेऊन उद्योग व्यवसाय करायला हवा. उत्पादनातील दर्जा, प्रामाणिकपणा, उत्पादनातील सातत्य, ग्राहकांच्या आवडीनुसार उत्पादन तयार करून त्याची विक्री करावी. याचसारखे तसेच इतर प्रयत्न उद्योजकाला सातत्याने करावे लागतात.’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख प्रा. नलिनी पाचर्णे यांनी करून दिली. डॉ. हर्षद जाधव यांनी आभार केले.